Tuesday, July 8, 2014

माहितीये! आम्ही पाहिलं ना टीव्ही वर…

सगळं लाइव्ह दाखवण्याऱ्या आजच्या मिडीयाने आपल्या आयुष्यातला एक छान आनंद हिरावून घेतलाय… तो म्हणजे किस्से सांगण्याचा!

जेव्हा टीव्ही नव्हता तेव्हा वारीला जाऊन आलेली माणसं त्यांच्या अनुभवाचं वर्णन किती रंगवून रंगवून करत असतील. त्यात प्रत्येकाचे अनुभव वेगळे, त्याकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगळी त्यामुळे प्रत्येकाची वारी वेगळी… आता कोणी सांगायला लागलं तर? लोक म्हणतील, "माहितीये! आम्ही पाहिलं ना टीव्ही वर…"

तीच कथा बिबट्या किंवा कोल्हा पाहिलेल्या माणसाची… बिबट्या किती जोरात पळाला हे जर कोणी सांगायला लागलं तर आयुष्यात कुत्रा सुद्धा जवळून न पाहिलेला माणूस तज्ञाच्या थाटात त्याला सांगू शकतो की "माहितीये! आम्ही पाहिलं ना टीव्ही वर!"

आणि अशीच गोष्ट पावसामुळे अडकून पडलेल्या माणसाची, काजव्यांनी भरलेली दरी पाहिलेल्या माणसाची, अपघात घडतांना पाहिलेल्या माणसाची आणि समुद्रात अचानक उंच उंच लाटा आल्या तेव्हाच चुकून मरीन ड्राईव्ह वर असणाऱ्या माणसाची…
बातमी सांगण्याला काहीच आक्षेप नाही. पण हल्ली बातमी सांगणारे त्याचा किस्सा करून सगळ्या जगाला सांगून टाकतात. मग आयुष्यात कधीतरीच असा भन्नाट अनुभव येणाऱ्या माणसांनी कुठे जायचं बरं???